Chitpavan Brahman Mandal, Aurangabad चित्तपावन ब्राह्मण मंडळ, औरंगाबाद - एक दृष्टिक्षेप

सुमारे  पंचेचाळीस  वर्षांपूर्वी  तत्कालीन  डी.आय.जी.  श्री.  श्रीपाद  गणेश  गोखले  यांच्या  नेतृत्वाखाली  आपल्या  शहरात  चित्तपावन ब्राह्मण संघाची  मुहूर्तमेढ  रोवण्यात  आली.  मात्र दुर्दैवाने त्याची वाटचाल  म्हणावी तशी  झाली  नाही.  सन 1997  साली  श्री. केशव विष्णुपंत  डोंगरे  यांनी  पुन्हा  नव्याने  मा. धर्मादाय आयुक्त,  औरंगाबाद  या  कार्यालयात  चित्तपावन ब्राह्मण मंडळ, औरंगाबाद  या  नांवाने  संस्था  रजिस्टर  करून  कार्यास  सुरवात  केली.   त्याकाळात  आपल्या  ज्ञातीतील  कुटुंबेही  मर्यादीत  होती  व  म्हणावी  तशी  उत्सुकता  पण  नव्हती.  या  सर्व  बाबीचा  विचार  करून  मा.  श्री.  पुरूषोत्तम  पळणीटकर  सेवानिवृत्त सत्र न्यायाधीश  यांनी  सन  2000  साली  आपल्या  घरी  एक  बैठक  घेतली  त्यावेळी  श्री.  महादेव  दत्तात्रय  अभ्यंकर  यांनी  अध्यक्ष  म्हणून  मंडळाची  धुरा  खांद्यावर  घेतली  व  खऱ्या  अर्थाने  संस्थेच्या  कार्यास  वेग  आला  व  त्याला  प्रतिसादही  मिळून  गेला.  त्यानंतर  पुन्हा 2002  साली  डॉ.  प्रकाश  उर्फ आबा  सहस्त्रबुद्धे  यांची  अध्यक्ष  म्हणून  निवड  झाली.  याच  काळापासून  लोकमान्य  टिळक  पुण्यतिथी,  भगवान  परशुराम  जयंती,  मकर  संक्रांत,  कोजागिरी पौर्णिमा,  प्रेक्षणीय  स्थळांच्या  सहली,  एकादशी  निमित्ताने  भजन  स्पर्धा  यासारखे  उपक्रम  सुरू  झाले.  आपल्या  ज्ञातीसाठी  वधू  वर  सूचक केंद्राची निर्मिती  अशा  कार्यक्रमाने  मंडळाचे  अस्तित्व  समाजाला  जाणवू  लागले.   हळू  हळू  संस्थेच्या  सभासद  संख्येत  वाढ  होऊ  लागली  व  त्यामुळे  मंडळाने  बाळसे  धरल्याचे  अनुभवास  आले.

दिनांक   31.10. 2010 साली  निवडणूक  होऊन  मा.  अध्यक्ष  श्री.  विकास  नारायण  गोंधळेकर,  निवृत्त  न्यायाधीश  यांची  बिनविरोध  निवड  होऊन  त्यांच्या  मार्गदर्शनानुसार  नवीन  कार्यकारणी  उत्साहाने  कामास  लागली.   संगीत  नाटकांची  रसिकांची  आवड  लक्षात  घेऊन  'मत्स्यगंधा',  'मानापमान',  'संत  कान्होपात्रा',  'कट्यार  काळजात  घुसली',  'संशयकल्लोळ',  'जय  जय  गौरीशंकर'  यासारख्या  अनेक  जुन्या  व  दर्जेदार  नाटकांचे  प्रयोग  व  श्री  शंकरजी  अभ्यंकर  व  पं.  ह्रदयनाथ  मंगेशकर  यांचा  'अमृताचा  घनु '  या  सारखे  कार्यक्रम सर्वार्थाने यशस्वी  झाले  व  मंडळाला  पण  बऱ्यापैकी  आर्थिक  लाभ  झाला.

डॉ.  प्रकाश  सहस्त्रबुद्धे  यांनी  जनसंवर्धनासाठी  'परशुराम'  द्वैमासिकाचे  वितरण  सुरू  केले  होते.  त्याला  नवीन  कार्यकारणीने 2011  साली  प्रथम  त्रैमासिक  व  नंतर 2012  सालापासून  शंभराच्यावर  पानांचा  अनेक  विषयाशी  निगडीत  असलेला  रंगीत  छपाई  सह  व  विविध  विषयास समर्पित'परशुराम  दिवाळी  अंक'   छापुन वितरित  करण्यास  सुरूवात  केली.

गेल्या  पाच-सहा  वर्षापासून  आपल्या  मंडळातर्फे ब्राह्मण उद्योजक  व  व्यवसायिकांसाठी  दिवाळी  ग्राहक  पेठेचे ' ना नफा - ना  तोटा ' या  तत्वावर  अत्यंत  यशस्वीरीत्या  आयोजन  केलेले  आहे. मंडळातर्फे  सभासदांसाठी  ज्ञातीतील  नामवंत  डॉक्टरांच्या  सहकाऱ्यांने  आरोग्य  निदान  शिबिर,रक्तगट  निदान  तसेच  रक्तदान  हे  उपक्रम  गेल्या  पाच-सहा  वर्षापासून  राबविले  जातात.

ज्ञातीतील  गरजू  विद्यार्थ्यांना  उच्च शिक्षणासाठी आर्थिक  सहाय्य  आपल्या  ज्ञातीतील  डॉ.  आनंद  व  डॉ.  सौ.  प्रेरणा  देवधर  आपल्या  मंडळाच्या  द्वारे  करीत  असतात.  आज  पर्यंत  आठ  विद्यार्थ्यांना  उच्च शिक्षणासाठी मंडळाने  आर्थिक  सहाय्य  केले  आहे. मंडळाच्या  महिला विभागातर्फे  दरवर्षी  मकरसंक्रांती  निमित्त  वेगवेगळ्या स्पर्धा,  सांस्कृतिक  कार्यक्रम  आयोजित  केले जातात.  मंडळातर्फे अनेक  वर्षा  पासून  वधू-  वर  सूचक  मंडळ  चालविले  जाते.

मंडळाच्या  संकेत  स्थळ  (वेब  साईट)  सोबतच  चित्तपावन  माहिती  कोश  (औरंगाबाद  शहर  व  मराठवाडा  विभाग)  उपलब्ध  होत  आहे.  याच्या  निर्मितीसाठी  श्री  आशिष  गोखले,  श्री.  पुर्णेंदू  गोखले,  सौ,  श्रीया  गोखले,  श्री.  रामचंद्र  गाडगीळ,  श्री.  समीर  आपटे,  तसेच  श्री.  शशिकांत  वझे,  सौ.  सुचित्रा  लेले,  श्री.  प्रकाश  गोडबोले,  श्री. उल्हास लेले,  डॉ. विनोद दातार,  श्री. दिनेश डोंगरे,  श्री.  रमेश  गोखले,  सौ.  सौदामिनी  जोशी,  श्री  भूषण  दाते,  श्री. जगदीश  अभ्यंकर ,सौ. सुषमा आपटे, ,सौ. मीरा सहस्त्रबुद्धे,  श्री.  सुहास सहस्त्रबुद्धे व सौ. स्मिता गानू यांचे  सहकार्य  मिळाले  आहे.  सुमारे 400  पानांचा  कृष्ण  धवल  व  रंगीत  छपाई  असलेला  हा  माहिती  कोश  मंडळाच्या  कार्यालयात  विक्रीस  उपलब्ध  आहे.  मंडळाच्या  संकेत  स्थळाची  निर्मिती  श्री.पुर्णेंदू  गोखले  यांनी  केली  असून  त्यांचे  व  चित्तपावन  माहिती  कोशाच्या  निर्मितीसाठी  ज्यांनी  सहकार्य  केले  अशा  सर्वांचे  मी  मनापासून  आभार  मानतो.  तसेच  आगामी  काळात  तरूण  व्यक्तींनी  मंडळाच्या  पुढच्या  वाटचालीचा  भार  घेऊन  मंडळाचा उत्कर्ष साधावा  अशी  विनंती  आणि  अपेक्षा  ठेवतो.

Chitpavan Brahman Mandal, Aurangabad
गुढीपाडवा
25 मार्च 2020
राष्ट्रीय सौर 5 चैत्र 1942
अध्यक्ष: विकास नारायण गोंधळेकर.   सचिव: सुभाष केशव आपटे.
चित्तपावन ब्राह्मण मंडळ, औरंगाबाद.





2020- All Rights Reserved -SPAN Infotech.